कथा – खालचा ’सा’ (अंतिम) भाग ३


दूसऱ्या दिवसापासूनच छोटा सुरिलाच्या स्पर्धेची तयारी सुरु झाली. मुलांना कॅमेराची सवय व्हावी म्हणून पूर्ण शूटींगची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. मुलांना कॅमेरे हाताळायला दिले. साऊंड रेकॉर्डिंग कसे चालते ते शिकवले गेले. माइक वापरायचा सराव झाला. अनेक अद्भूत गोष्टी! मुलं तर हरखूनच गेली.

स्वरेश ह्या सगळ्या गोष्टीत चांगलाच रमून गेला. आठवड्याभरात पहिल्या भागाचे शूटींग झाले. स्वरेशचे पहिल्या भागात पहिलेच गाणे होते. “ओंकार स्वरूपा” गाऊन स्वरेशने नुसती परिक्षकांचीच नाही तर हजर प्रेक्षकांचीही मनं जिंकली. माधवराव आणि संगीता वहिनींचा आनंद गगनात मावत नव्ह्ता. २ दिवसातच प्रसारण झाले आणि घरचा फोन आणि आईबाबांचे मोबाईल सारखे खणखणत होते. शुभेच्छांचा नुसता वर्षाव चालला होता. रातोरात स्वरेश स्टार झाला होता. पण ह्या सगळ्या गदारोळात स्वरेश मात्र अलिप्त होता. नेहमी हसत खेळत बागडणारा स्वरेश एकदम अंतर्मुख झाला होता. पण त्याचे आई बाबा आकस्मित प्रसिद्धीत एवढे रममाण झाले होते की त्यांच्या कुठले लक्षात यायला.

त्या रात्री स्वरेशला झोपच आली नाही. त्याला मनातून ह्या स्पर्धेतून बाहेर पडायचे होते. ह्या स्पर्धेमुळे त्याचे मित्र त्याला दुरावले होते. सगळे मित्र पूर्ण सुट्टीभर धमाल करत होते आणि हा आपला एका ट्युशन मधून दुसऱ्या ट्युशन मधे. सुट्टीची मजाच आली नाही. थोड्यावेळाकरता तर स्वरेशला असे पण वाटले की मुद्दाम वाईट गावे म्हणजे स्पर्धेतून बाद होऊ पण मग आई बाबांचा पडलेला चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर आला. बाबा तो लहान असता पासून सांगायचे कि त्याला मोठ्ठा गायक बनायचे आहे. तो गायक झाला नाही तर त्यांची सर्व स्वप्न धुळीला मिळतील. अर्थात ह्याचा मतितार्थ कळायचा नाही पण आपण गायलो नाही तर काहीतरी भयंकर होईल असे काहीतरी स्वरेशला वाटे. फक्त बाबांना खुष करायचे म्हणून स्वरेश स्पर्धेत गात होता.

स्पर्धेत स्वरेशला प्रत्येक भागात यश मिळत होते. सगळीकडून कौतुक होत होते. आता शाळा पण सुरु झाली होती. अभ्यास आणि गाणे दोन्ही चालू होते. शाळेने स्वरेशला शूटिंगसाठी गैरहजर रहायची परवानगी दिली होती. एक दिवस मराठीच्या बाईंनी मुलांना निबंध लिहायला दिला होता. विषय होता “मला जादूची कांडी मिळाली तर” स्वरेशने दिलेल्या वेळेत निबंध लिहून बाईना वही दिली. तपासायला म्हणून बाई मुलांच्या वह्या घरी घेऊन गेल्या. छोटा सुरीला पाहताना बाईंना स्वरेशच्या निबंधाची आठवण आली, आणि त्यांनी त्याची वही उघडली. निबंध वाचता वाचता बाईंच्या डोळ्यात चक्कं अश्रू आले. त्यांनी वही बंद केली. टीव्ही बंद केला. आणि मुख्याध्यापिकांना फोन केला, तेव्हा कुठे त्यांना शांत वाटले. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापिका बाईनी निबंध वाचला. त्यांची पण तीच गत. त्यांनी स्वरेशची फाईल मागवून त्याच्या आईचा नंबर शोधला आणि लागलीच फोन करून शाळेत भेटायला बोलावले. कॉलेज मधून परस्पर येते असे सांगितले, तर मुख्याध्यापिका म्हणाल्या की दोघांनी यायला हवं.

दुसऱ्या दिवशी संगीता वहिनी आणि माधवराव मुख्याध्यापिकांना भेटायला गेले. स्वरेशच्या मराठीच्या बाई होत्याच. त्यांनी स्वरेशची निबंधाची वही पुढे केली. माधवरावांनी निबंध वाचून वही संगीता वहिनींच्या हातात दिली आणि सुन्नं बसून राहिले. संगीता वहिनींना तर निबंध वाचून हुंदकाच फुटला. स्वरेशने निबंधात लिहिले होते की जर त्याला जादूची कांडी मिळाली तर तो ह्या जगातून गाणेच नष्ट करेल. तबला पेटी तानपुरा सर्व नाहीसे करून टाकेल. कारण ह्या गाण्यापायी त्याला मित्रच राहिले नाहीत. रोज चांगला परफॉर्मन्स द्यायचे टेन्शन येत होते. रात्री डोळ्यासमोर नी, वरचा सा येऊन दचकून जाग येत होती. हे सर्व नको नकोसे झाले होते. एकदा गाणेच नष्ट झाले तर ह्या गोष्टी पण आपोआप निघून जातील. परत मित्र मिळतील. क्रिकेट, पोहणे अशी चंगळ करता येईल. असे काहीसे लिहिले होते.

माधवराव मुख्याध्यापिकांना म्हणाले, “मॅडम, नकळत आम्ही आमच्या मुलावर किती अन्याय केला. त्याच्या अंगावर एवढे मोठे ओझे टाकले. त्याचे बालपण हिरावून घेत होतो आम्ही. आपल्या मुलाला गाण्याच्या स्पर्धेत वरचा सा मिळावा म्हणुन अपेक्षा धरणारे आम्ही पालक ह्या नात्याने खालचा सा पण मिळवण्याच्या लायकीचे उरलो नाही.” मुख्याध्यापिका म्हणाल्या, “आपण नुसते तारे जमीन पर, थ्री इडियट्स सारखे सिनेमे पाहतो. आपण सिनेमात दाखवलेल्या पालकांसारखे नाही असे स्वतःला म्हणवतो. पण कुठेतरी ह्या सिनेमातला संदेश आपण विसरूनच जातो नाही का? मुलांना काय हवे तेच जाणून घेत नाही. मग त्यांच्या आतला असंतोष खदखदत राहतो. त्यातून मग काही मुलं आत्महत्त्येचा मार्ग अवलंबतात. नशीब स्वरेशच्या मनातला कल्लोळ आपल्याला लवकर कळला. आता घरी जाऊन ह्या विषयी वाच्यता न करता त्याच्यावरचे ओझे कसे दूर करायचे ते ठरवा.”

शिक्षकांचे आभार मानून ते दोघं घरी परतले. बाबांना पहाताच स्वरेशने सवयी प्रमाणे पेटी काढली. रियाजाला उशीर झाला होता. पण बाबा म्हणाले, “अरे स्वरेश आता उशीर झाला आहे. आज नको तो रियाज. खरं तर तु इतका छान गातोयस, काही दिवस तुझ्या गळयाला आराम. ट्युशन्स पण नाही.” स्वरेश चकीत होऊन बाबांकडे बघायला लागला. म्हणाला, “खरंच? मग स्पर्धेचं काय?” “अरे, तू असाच पुढे जाशील. टेन्शन न घेता गायचं. सर्वांना माहितेय आमचा स्वरेश किती छान गातो ते. त्यासाठी एव्ह्ढा आटापिटा करायची काय गरज?” स्वरेशने हाताला चिमटा घेऊन आपण स्वप्नात नाहीना ह्याची खात्री करून घेतली. “चल, बघतोस काय? उचल ती पेटी आणि ठेव जागेवर. आणि हो! तुझ्या मित्रांना सांग कि पुढच्या शेड्युलला मी त्यांना सर्वांना घेऊन जातोय. तुला चिअर अप करायला. त्यांना आई बाबांची परवानगी काढायला सांग”. स्वरेश तर आनंदाने उड्याच मारायला लागला. दुरावलेल्या मित्रांना जवळ करायची संधीच चालून आली होती ना!

पुढ्च्या शेड्युलला स्वरेश “सुरत पियाकी” हे नाट्यसंगीत बेफाम गायला. परिक्षकांकडे कौतुकाला शब्द नव्ह्ते. त्याच्या मित्रांनी तर पूर्ण स्टुडिओ डोक्यावर घेतला. शूटिंग नंतर माधवराव सर्वांना चौपाटीवर घेउन गेले. भेळ, पाणीपुरी, आईस्क्रिम म्हणजे नुसती चैन चालली होती. स्वरेशच्या तर चेहेऱ्यावरून आनंद ओसंडून चालला होता. माधवराव स्वरेशला न्याहाळत होते. फार दिवसांनी स्वरेश एव्हढा खुशीत होता. त्याच्याकडे बघता बघता डोळे पाणावले कधी हे कळलेच नाही.

(समाप्त)

15 thoughts on “कथा – खालचा ’सा’ (अंतिम) भाग ३”

    1. महेंद्र, रुपाली,हेरंब आणि विद्याधर,

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! उशीरा उत्तराबद्दल क्षमस्व! मुंबईत कामानिमित्त गेल्याने नेट वर येणे जमले नाही.

      -निरंजन

    1. @अल्पना, प्रतिक्रियेबद्दल धंन्यवाद!
      @शरद, गोष्ट आवडली हे वाचून बरे वाटले. खरं तर गोष्ट चालू केली तेव्हा मलाच शेवट कसा होईल ते माहित नव्हते. पण शेवटी मी लेकुरवाळा माणूस. फास वगैरे प्रकरणाचा विचार पण करवत नाही! बाकी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

Leave a reply to Mahendra उत्तर रद्द करा.