जो भजे हरि को सदा
पाच मिनिटापूर्वी पत्नीचा फोन आला की पंडितजी गेले. मन विषण्ण झाले. कोणीतरी जवळचे गेल्यावर होते तसेच. वास्तविक गेले काही दिवस पेपरातून त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या वाचून मनाची तयारी झाली होतीच. पण आता ते खरच नाहीत ह्याची बोचरी जाणीव झाली. गेली कित्येक दशकं ह्या अनभिषिक्त सम्राटानं कित्येक जाणकार आणि माझ्या सारख्या संगीतात अजाण रसिकांच्या मनावर राज्य केलं. माझ्या बालपणीच्या कित्येक सकाळी रेडिओवरच्या पंडितजींच्या अभंगवाणीनं प्रफुल्लीत केल्या आहेत. सकाळची शाळा असे तेव्हा पांघरूणातून बळेबळे उठून दास घासताना पंडितजींचे सूर कानावर आले की सगळी मरगळ निघत असे. नंतर इंजिनीरिंगला असताना भीमसेनजींच्या रागदारीवर गणिताचा अभ्यास रात्री जागून केला आहे. नकळतच पंडितजी म्हणजे घरचीच एक व्यक्ती बनून गेले होते.
पंडितजींचे शेवटचे दर्शन सवाईला ते थोड्या वेळासाठी आले होते तेव्हा झाले. सवाईच्या शेवटच्या दिवशी पूर्वीच्या सभेत पंडितजींनी गायलेल्या “तीर्थ विठ्ठल” ची चित्रफीत दाखवली होती. त्यांचे गाण्यात पूर्ण रंगून जाणं, पूर्ण अंग घुसळून ताना घेणं सारच विलक्षण. अंगावर नुसते रोमांच उभे राहिले होते. सिंहाने राज्य करावं तसं राज्य केलं आणि खरच म्हणावसं वाटलं की झाले बहु होतीलही बहु परतू यासम हाच!
जाता जाता पंडितजींच्याच एका अजरामर भजनात थोडासा बदल करून श्रद्धांजली अर्पण करतो..
जो भजे सूरको सदा
सो ही परम पद पायेगा
सो ही परम पद पायेगा
आज रात्री राग दरबारी आणि जो भजे ऐकून पंडितजींचे स्मरण करणार. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
माझ्या पत्नीची यथार्थ प्रतिक्रिया – “गंधर्व स्वगृही परतले…”


पंडितजींवर तुम्ही खूप छान लिहिले आहे. कृपया माझाही लेख पाहावा wordpress वर. धन्यवाद
नंदन हेर्लेकर