Archive

Archive for नोव्हेंबर 21, 2010

प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर – पंचमढी (भाग २)

नोव्हेंबर 21, 2010 7 comments
पंचमढी

२९ तारखेला रात्री ९:४० ची मुंबई सीएसटी वरून सुटणारी मुंबई कोलकाता मेल पकडायची होती. मुंबईच्या वाहतुकीचा धसका असल्याने संध्याकाळी ४ वाजताच आम्ही पुण्यावरून प्रयाण केले. पुण्यावरून मुंबईला जायला बऱ्याच प्रायव्हेट गाड्या आहेत. पण वाजवी दारात मुंबई पुणे टॅक्सी असोशिएशनची पॉईंट टू  पॉईंट  कुल कॅब जास्त भरवशाची आणि वाजवी दरात मिळते. फक्त एक तास आधी बुक करायची. आता तर त्यांनी टोयोटा इनोव्हा सुद्धा उपलब्ध केल्या आहेत. आम्ही मात्र साधी इंडिकाच घेतली (माझा कंजूष पणा दुसरे काय?).  ७२ वर्षाचे सरदारजी ड्रायव्हर होते. गेली ५६ वर्षे हे टॅक्सी चालवतायत. फाळणीनंतर निर्वासित म्हणून मुंबईत आले तेव्हापासून मुंबईतच. मूळ गाव आता पाकिस्तानात. “आपका मुलुख कौनसा” असा प्रश्न विचारला तर म्हणाले मुंबईच आमचे गाव. “हम महाराष्ट्रीयनही है”  त्यांच्या मुलांना छान मराठी बोलता येतं. साक्षात फाळणीचा अनुभव घेतलेला माणूस भेटायला मिळाला ह्याचं अप्रूप मुलांना वाटत होतं. मुलगी म्हणाली, “History is alive in front of us!”

ट्रेन चक्क  “निर्धारित समयपर” सुटली. बर्थवर अंथरूण पांघरुणाची छान सोय झाली होती.  रात्र असल्याने झोपण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.  रात्रभर ट्रेनचा डबा एव्हढा हलत होता की पूर्ण अंग घुसळून निघालं. पूर्वी पण मी स्लीपरक्लास मध्ये प्रवास केला आहे. तेव्हा एवढे घुसळून गेल्याचे आठवत नाही. मला वाटतं की पूर्वीचे रूळाखालेचे  लाकडी स्लीपर बदलून सिमेंटचे स्लीपर घातल्या मुळे धक्के वाढत असावेत किंवा डबे जुने झाले असल्याने ही परिस्थिती असावी. रात्री विशेष जेवण झाले नव्हते. तेव्हा सकाळी ट्रेनमधील आम्लेट स्यांडविच मागवले. अप्रतिम चव होती.

११ वाजता पिपारीयाला उतरून प्रायव्हेट जीपने पंचमढीला पोचलो. पिपरिया – पंचमढी रस्ता अरुंद असला तरी चांगला आहे. घाट सुरू होईपर्यंत दुतर्फा फक्त सागाची झाडे. नंतर साल वृक्ष. ह्या सालचे खोड चांगलेच मजबूत असते. पूर्वी रेल्वेलाईन च्या खाली जे लाकडी स्लीपर्स असत ते ह्याच झाडाच्या खोडाचे. घाट सुरु झाला तसे हवा बदलली आणि थंडी सुरू झाली.पंचमढीला हॉटेल ग्लेनव्ह्यू  मध्ये बुकिंग होते. हॉटेल ग्लेनव्ह्यू हा पूर्वी ब्रिटीशलोकांचा बंगला होता. स्वातंत्र्योत्तर काळात  पी डब्लू डीने घेतला. पुढे मध्यप्रदेश सरकारने त्याचे हॉटेल मध्ये रूपांतर केले. चांगली १०-२० एकर जागा असेल. प्रशस्त बाग, मोठे व्हरांडे असलेली मेन बिल्डींग आणि पिछाडीला प्रायव्हेट कॉटेज आणि तंबू. आमचे तंबू मध्ये बुकिंग होते. हा तंबू म्हणजे शामियानाच जणू काही. एसी आणि बाथरूम सकट. १४ x १५ च्या चौथऱ्यावर बांधलेला तंबू. भरपूर जागा होती. हॉटेल मधेच जेवणाची सोय होती. जेवण साधेच पण अप्रतिम. आम्ही गेलो त्या दिवशी विशेष गर्दी नव्हती त्यामुळे एकूण सर्विस छान होती. पुढे गर्दी वाढल्यावर मात्र खालावली.

पंचमढी आणि माथेरान मध्ये बरेच साम्य आहे. जास्त गर्दी नाही. दुकाने फक्त बाजारपेठेतच. बाकी शांत भाग. इकडला बराचसा भाग सैन्याच्या ताब्यात आहे. आणि अजून तरी आपले “आदर्श” नेते ह्या भागात जागा लाटू शकलेले नाहीत. त्यामुळे ह्या जागेची महाबळेश्वर सारखी वाट लागलेली नाही. बाजारपेठेत स्वस्त कामचलाऊ अशी बरीच हॉटेले आहेत. थोडे दूर गेले तर MPTDC ची हॉटेले आहेत.  टूर कंपनी वाले बाजारपेठेतच उतरवतात. ज्याना पंचमढी पटेल व्हाल्यू (हा शब्दप्रयोग “आम्ही तिकडे गेलो होतो हो!” अशा फुशारक्या मारण्यासाठी केलेल्या पर्यटनाला वापरला जातो. का ते विचारू नये!) म्हणून करायचे आहे त्यांनी खुशाल बाजारपेठेतील हॉटेलात उतरावे.  पण पंचमढीचा खरा आनंद लुटायचा असेल तर MPTDC ला पर्याय नाही. (टीप : मला MPTDC कमिशन देत नाही). 

इकडली प्रेक्षणीय स्थळे दोन भागात विभागली आहेत. एक म्हणजे मंदिरे (बहुतांश शंकराची) आणि दुसरी म्हणजे रानातील धबधबे. आणि हे स्थळे पहायला जाण्यासाठी मारुती जिप्सीची सोय मिळते. पुण्या मुंबईत मारुती जिप्सी अगदी नामशेष झाली असली तरी इकडे मात्र ह्या गाड्यांचा सूळसूळाट आहे. विशेष करून धबधबे पहायला जायचा रस्ता कच्चा असल्याने फोर व्हील ड्राईव्ह गाडी असणे  गरजेचे असते. तिकडे ह्या जिप्सी उपयोगी पडतात. तुमची तीर्थयात्रेची इच्छा नसेल तरी इकडची शंकराची मंदिरे जरूर पहावी अशीच आहेत. नैसर्गिक गुहेत लपलेली ही मंदिरे वेगळाच अनुभव देऊन जातात. गुप्त महादेवाचे मंदीर हे एका चिंचोळ्या गुहेत आहे. दोन दगडाच्या कपारीत एक माणूस मावेल एवढीच रुंदी. त्यातून गाभाऱ्यात जायचे. जटाशंकर च्या मंदिरात जायचे तर एका दरीत सुमारे ३०० मीटरचा उतार आणि गुहेची उंची एव्हढी कमी की अगदी नास्तिक माणसाला सुद्धा वाकूनच आत जावे लागेल. त्यातल्या त्यात बडा महादेव मंदीर हे सर्वसामान्य आहे. ह्या मंदिरांत निवांत बसणे हा सुद्धा एक सुखद अनुभव आहे. शंकराचे अजून एक मंदिर आहे चौरागढला. १२०० पायऱ्या चढून जायचे. हा देव नवसाला पावतो. आणि नवस फेडायला देवाला त्रिशूळ वाहायचा. चौरागढ करायचे तर एक पूर्ण दिवस लागतो. जाऊन येऊन ६ तास. वेळे अभावी आम्ही चौरागढला जाऊ शकलो नाही.

पंचमढीचे धबधबे हे वनखात्याच्या अखत्यारीत येतात. जीप मागे ४५० रुपये एका दिवसाचा टोल द्यायचा. त्यात एक गाईड पण मिळतो.  धबधबे विलक्षण वगैरे नसले तरी ह्या धबधब्यांकडे नेणाऱ्या पायवाटा खूपच सुंदर आहेत. हौशी पण अननुभवी ट्रेकर्सना झेपेल असा रस्ता. दुतर्फा साल, मोह, आवळा अशी अस्सल भारतीय झाडे आणि त्यातून जाणारी वाट. काही ठिकाणी दगडी पायऱ्या , खळखळते पाणी, आणि थंड हवा. ह्यामुळे थकवा काही येत नाही. रजत प्रपात हा लोणावळा खंडाळ्याला पावसाळ्यात दिसेल असाच एक धबधबा. उन्हात चांदी सारखा चमकतो म्हणून रजत प्रपात. पुढे आहे अप्सरा विहार कुंड. ह्याला अप्सरा विहार कुंड अशासाठी म्हणतात कि इंग्रजांच्या काळात गोऱ्या मडमा इकडे डुंबायला येत. त्यांना पाहून आदिवासींना वाटे की जणू अप्सराच विहार करतायत.  म्हणून अप्सरा विहार कुंड. येथे आधुनिक अप्सरा करीना कपूर ने अशोका सिनेमाच्या चित्रीकरणात भाग घेतल्याचे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. दुसरा धबधबा म्हणजे “बी फॉल्स” ह्या धबधब्याच्या खाली उभे राहिल्यास पाण्याचा प्रवाह मधमाशांच्या डंखा प्रमाणे बोचतो म्हणून बी फॉल्स. ४०० मी. ची उतरंड करून ह्या धबधब्याच्या तळाशी जाता येते. ह्यात अंघोळ करून एकदा भिजले की उन्हात कोरडे व्हायचे आणि डोंगर चढून परतायचे. हा डोंगर विनासायास चढणे म्हणजे आपल्या हृदयाच्या निरोगीपणाची पावती मिळवणे असे समजायला हरकत नाही.

इकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे माकडांचा धुमाकूळ. आमच्या गाईडच्या म्हणण्या नुसार गावाची लोकसंख्या १५००० तर माकडे १९००० ! आणि भलतीच सोकावलेली माकडे आहेत. एका मुलीच्या हातातील पर्स आमच्या देखात एका माकडाने हिसकावून घेतली. तेव्हा इकडे फिरताना हातातील गोष्टी संभाळणे फार महत्त्वाचे.

मुक्कामाच्या तिसऱ्या दिवशी रात्रीची ८:३० वाजता पिपरिया वरून सुटणारी भोपाल – जबलपूर जनशताब्दी गाठायला आम्ही संध्याकाळी पंचमढीला रामराम ठोकून रवाना झालो.

प्रवासवर्णन – पंचमढी – भेडाघाट – इंदौर – पूर्वतयारी (भाग १)

गेली चार वर्ष दिवाळीची सुट्टी म्हटलं की एक वार्षिक कौटुंबिक सहल हा आमचा शिरस्ता ठरलेलाच आहे. केरळ, राजस्थान आधीच पाहून झालेले. तेव्हा ह्या वेळी मध्यप्रदेशला जायचे ठरवले. असे लांबचे प्रवास म्हटले की पुण्या मुंबईचा मराठी मध्यमवर्ग डोळे मिटून केसरी – सचिन असे सोपे पर्याय निवडतो. आम्ही सुद्धा केरळला केसरी तर्फेच गेलो होतो. पण टूर बरोबर जायचे म्हणजे सकाळी लवकर उठून बस मधून गरागरा फिरायचे १७६० ठिकाणे अल्पावधीत पहायची, रोज मराठी जेवण जेवायचे असा दिनक्रम करायची आमची काही ईच्छा नव्हती. केरळ च्या सहली नंतर मला श्रमपरिहारासाठी लगेच एक निवांत सहल काढायची गरज भासली होती. राजस्थानला जाताना पुण्याच्या भांडारकर रस्त्यावरील एका नामांकित एजंटा कडून सहल आयोजित करून घेतली पण त्यांनी व्यवहारात बऱ्यापैकी फसवले होते.  तेव्हा ह्या खेपेस स्वतःच सहल आयोजित करून फिरायचे ठरवले.

एकदा मध्यप्रदेशला जायचे ठरल्यावर प्रश्न आला तो कोठली स्थळे पहायची ते. एका सहलीत पूर्ण मध्यप्रदेश पाहणे अशक्यच होते. आणि सुट्ट्यांच्या अभावामुळे आमच्याकडे फक्त १० दिवस होते. तेव्हा मध्यप्रदेशचा दक्षिण भाग पहायचे ठरवले. राजस्थानला रणथंबोर  पाहून झाले होते आणि आम्ही विशेष प्राणीमित्र वगैरे नसल्याने कान्हा वगळले. आधी फक्त इंदौरला गाडी घेऊन जायचे आणि जवळची ठिकाणे करायची असा बेत होता. मात्र नुकतीच नर्मदा परिक्रमेवर ३ पुस्तके वाचल्यामुळे व नेटवर मार्बल रॉकचे वर्णन वाचल्यामुळे जबलपूर जवळच्या भेडाघाटला कुठल्याही परिस्थितीत जायचेच असा फतवा मी काढला. बायकोला पंचमढीला जायचेच होते. आता माथेरान महाबळेश्वर सारखेच अजून एक हिलस्टेशन कुठे म्हणून मी नाराजीचा सूर लावला होता, पण स्त्रीहट्टाला बळी पडून पंचमढीला पण जायचे ठरले. इंदौर – पंचमढी – भेडाघाट हा एकून पल्ला जवळपास ६०० किमी एवढा आहे. शिवाय पुणे – इंदौर हा एकतर्फी ६०० किमी. म्हणजे एकून २४००- २५०० किमी आणि १० दिवस हे गणित जमत नव्हते. म्हणून स्वतःची गाडी काढण्याचा बेत रद्द केला आणि रेल्वेचा पर्याय स्वीकारला.

आमचे प्लॅनिंग जुलैमध्येच सुरू झाले असल्याने आणि आम्हाला हव्या असलेल्या गाड्यांचे  आरक्षण ऑगस्टमध्ये सुरू होत होते. त्यामुळे तिकिटे मिळण्याची खात्री होतीच. आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी गजर लाऊन बरोब्बर ७:३० वाजता रेल्वेच्या ऑनलाईन वेबसाईट वर लॉगीन करून बुकिंग करायचे असे तीन दिवस करून सर्व गाड्यांचे बुकिंग करून टाकले. इंदौर वरून परतीचा  प्रवास मात्र विमानाने करायचे ठरले. बऱ्याच आधी बुकिंग केल्यामुळे स्वस्तात तिकीटे मिळाली. आता आले हॉटेल बुकिंग. आमचे स्नेही मधुकर भाटीया ह्यांनी नुकतीच स्वतःच्या गाडीने एक महिनाभर मध्य – उत्तर  भारत दर्शन सहल केली होती (पहा: ध्रुव भाटीयाचे प्रवास वर्णन). त्यांच्या सल्ल्यानुसार MPTDC च्या हॉटेल मध्ये बुकिंग करायचे असे ठरवले. पण प्रत्यक्षात फक्त पंचमढीलाच MPTDC च्या हॉटेल मध्ये राहिलो. जबलपूरला एकच दिवस मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ ला इंदौरची ट्रेन असल्याने आम्हाला लेट चेकऔट हवा होता. म्हणून आमचा मित्र आराधना ट्रॅव्हल्स संचालक मंदार किराणे ह्याच्या ओळखीने सामदरिया हॉटेल मध्ये २४ तास १ रूम मिळाली. इंदौरला MPTDC चे हॉटेल नाही. अशा तऱ्हेने प्रवासाची जय्यत तयारी ऑगस्ट मधेच पूर्ण झाली.

तेव्हा हे झाले नमनाला घडाभर तेल. पुढच्या लेखात वाचा प्रत्यक्ष प्रवासवर्णन.

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 36 other followers