Archive

Archive for मार्च, 2010

“हेचि काय फळ तव तपाला” !

मार्च 23, 2010 6 comments

काल ई-सकाळवर डोमिसाईल प्रमाणपत्रावर लेख वाचत होतो. त्यात एका निवृत्त सैनिकाची प्रतिक्रिया आहे. गोव्यात जन्मलेले पण जन्माने मराठी असलेले हे गृहस्थ भारतीय सेनेत दाखल झाले. सैन्याची नोकरी, तेव्हा पोस्टिंग हे सीमेवरच. आयुष्यातील बराच काल महाराष्ट्रा बाहेर गेलेला. १० वर्षापूर्वी निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाले. पण आता परिस्थिती अशी की ह्यांना / ह्यांच्या मुलांना डोमिसाईल प्रमाणपत्र मिळत नाहीये. कारण अशा प्रमाणपत्रासाठी १५ वर्ष महाराष्ट्रात राहावे लागते किंवा जन्माने महाराष्ट्रीयन असावे लागते. दुर्दैवाने ह्या दोन्ही पात्रता कसोट्यात हे गृहस्थ येत नाहीत. देशासाठी २७ वर्षं सेवा करून, ह्यांच्या पदरी सरकार कडून एका अर्थी नकारघंटाच. ही जर सत्य स्थिती असेल तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे.

सैनिकांची एकूणच परिस्थिती अवघड. प्रतिकूल परिस्थितीत राहून ज्या देशाच्या संरक्षणासाठी लढायचं, त्याच देशात, निवृत्ती नंतर लाल फितीमुळे तयार झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत जगायचं! माझ्या एका बालमित्राचा मावसभाऊ कारगिल मध्ये होता. हिमवादळात जायबंदी झाला म्हणून त्याला परत पाठवले. खिशात एक पैसा नाही. डॉक्टरी उपचार नाहीत. अशा परिस्थितीत बिचारा कसाबसा गावाला परतला. देशासाठी लढणाऱ्या, प्रसंगी आत्मसमर्पण करायची तयारी असणाऱ्या ह्या धाडसी सैनिकांची ही गत होत असेल तर ही फक्त त्या सैनिकांचीच नव्हे तर साऱ्या देशाचीच शोकांतिका आहे असे म्हणावे लागेल.

भारत सरकारच्या एकूण खर्चाच्या १४%  खर्च हा संरक्षणावर होतो.  पाकिस्तान , चीन ह्यासारखे उपद्व्यापी शेजारी आणि हजारो किमी ची आपली सीमारेषा. अशी परिस्थिती असताना सैन्याचे महत्त्व खूपच आहे. जर त्याची योग्य ती काळजी घेतली नाही तर नवीन तरुण कसे आकर्षित होणार? २००७ च्या एका अहवालानुसार “ऑफिसर” पदाच्या २४% जागा रिकाम्या आहेत. ह्याला कारणे बरीच आहेत. जोखमीचे काम आणि त्यामानाने कमी पगार, बढतीची क्लिष्ट प्रक्रिया ही  त्यातील मुख्य  कारणे!  तरी बरं सहाव्या वेतन आयोगामध्ये सैनिकान्च्या पगारवाढीची तरतूद केली आहे.

देशाच्या मूलभूत गरजा, अन्न आणि सुरक्षा ह्यांचे महत्त्व लक्षात घेऊनच दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री ह्यांनी “जय जवान जय किसान” अशी घोषणा केली होती. दुर्दैवाने हे दोन्ही व्यवसाय सध्या पूर्णपणे दूर्लक्षित आहेत. ईतके की एक स्पर्धा काय जिंकली तर क्रिकेटर्स ना आपण डोक्यावर घेउन नाचतो. त्यांच्यावर पैशाचा वर्षाव करतो. त्यांना करसवलती देतो. पण कारगीलचा एक योद्धा घरी परतताना साध्या रेल्वेचे तिकीट खरेदी करू शकत नाही. ह्यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय?

जाता जाता एक निरीक्षण. ह्या जवान आणि किसानांशी संबंधित दोन्ही “खाती” सांभाळलेले मन्त्री कोण तर साक्षात “शरद पवार”! एक योगायोगच म्हणायचा!

आयपीएल आणि करसवलत

मार्च 17, 2010 7 comments

नुकतीच बातमी वाचली की महाराष्ट्र सरकार आयपीएलच्या सामन्यांवर करमणूक कर लावावा कि नाही ह्यावर विचारविनिमय करत आहे. आता गम्मत अशी की काँग्रेसला कर लावायचा आहे आणि राष्ट्रवादीला नाही. राष्ट्रवादी कर लावायला विरोध का करत आहे हे  सुज्ञास सांगणे न लगे! ही बातमी वाचली आणि मला फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळची गोष्ट आठवली. घरात ब्रेड नाही म्हणून राजवाड्यावर आलेल्या जनतेच्या मोर्चाला उद्देशून फ्रेच राजकुमारीने “ब्रेड नाही तर केक खा” असे वक्तव्य केले होते. तसेच काहीसे आत्ता चालले आहे. साखर परवडत नाही? स्वस्तात आयपीएल पहा!

क्रिकेट पाहायला मलाही आवडते. आयपीएलतर्फे खेळाडू आणि संधीसाधूंची तुंबडी भरली जातेय म्हणून दु:श्वास पण नाही. पण आयपीएल लोकप्रिय झाले म्हणून काय त्यांना कर माफ? एवढी काय देशसेवा केली आहे मोदी आणि कंपनीने? आयपीएल च्या यशामुळे भारताची मान जगात उंचावली आहे असे मोदी म्हणतात. अहो पण ज्या देशात सामान्य माणूस एक वेळचे पोटभर जेवू शकत नाही, पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करतो, त्या देशाला आयपीएल मधून मिळणारी प्रतिष्ठा काय कामाची? ह्यातून मिळणारा पैसा गर्भाश्रीमन्तांच्याच खिशात जाणार ना शेवटी? मग भरावा लागला करमणूक कर, तर बिघडले कुठे? असे ऐकतो की ह्या करसवलतीमुळे शासनाचा ३०० कोटी रुपये महसूल बुडणार आहे. बाकीच्या राज्यांनी हा करमणूक कर लादला आहे. शिवाय ह्या सामन्यांना लागणाऱ्या सुरक्षेचा खर्च पण आयपीएल वरच टाकला आहे. पण आमचे दयाळू सरकार, ज्याचे मंत्री आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना नशाबाज असा शिक्का लावतात, ते मात्र आयपीलला करसवलत देऊन डोक्यावर बसवायला निघाले आहे. धन्य आहे!

मिसळाख्यान

मार्च 12, 2010 19 comments
आजकालच्या पंचतारांकित हॉटेलांच्या जमान्यात अजूनही मला बाहेर खाण्याचा परमानंद मिळतो तो म्हणजे कुठल्यातरी चिंचोळ्या बोळात, ग्राहक म्हणजे कोणी राजा वगैरे नसून ह्या पृथ्वीतलावरचा एक तुच्छ किडा आहे अशी धारणा असणाऱ्या मालकाच्या कळकट टपरीत लाईनीत उभे राहून, आपला नंबर लागल्यावर पुढ्यात आदळून ठेवलेल्या प्लेट मधली झणझणीत मिसळ ओरपण्यात. तुम्हाला माहित आहे? एखाद्या हॉटेलमधील मिळणाऱ्या मिसळीचा झणझणीतपणा न खाता ओळखणे अगदी सोपे आहे. एक म्हणजे हॉटेल मधला कळकटपणा पाहावा, जितके कळकट हॉटेल तितकी तिखट मिसळ. आणि दुसरे म्हणजे हॉटेलातील पब्लिक. जर सडेफटिंग, विशी ते पन्नाशी मधली पुरुषमंडळी जास्त असतील तर मिसळ हमखास तिखट. कोलेज मधली जोडपी असतील तर मिसळ सणसणीत, पण थोडी सुसह्य. जर मध्यमवर्गीय जोडपी असतील तर थोडीशी तिखट. आणी जर पोरंबाळ असतील तर अश्या हॉटेल मध्ये मी तरी मिसळ खात नाही. कारण अशा ठिकाणी मिळणारी मिसळ ही म्हणजे एसेल वर्ल्डला जाऊन फक्त १० फूट उंचीच्या पाळण्यात बसून परत यायचं, किंवा मसाला दूध पिऊन भांगेच्या नशेची अपेक्षा करायची.

पुण्यात ह्या सर्व प्रकारच्या मिसळी मिळतात. मिसळीच्या तिखटपणाच्या चढत्या भाजणी नुसार काही नावे द्यायची, तर पहिला नंबर पोटोबाचा. पोटोबा नावाची हॉटेलची नवीन चेन आहे. ह्यांची हॉटेल्स कोथरूडला महात्मा सोसायटीजवळ आणि करिष्मा जवळ, आणि औंधला McDonalds च्या मागे अजून एक अशा तीन शाखा आहेत. पुण्याच्या “आमची कोठेही शाखा नाही” नियमाचा भंग करण्याचं धाडस करणारे मला वाटतं हे पहिले मराठी उद्योजक.  ह्यांच्याकडे सर्वच पदार्थ छान मिळतात. मिसळ सुद्धा सौम्य असली तरी चविष्ट. सहकुटुंब सहपरिवार खाता येईल अशी मिसळ. पण जसे ताकाला कछछी बियर म्हटले म्हणून ते चढत नाही, तशी ही मिसळ सणसणीत दणका देत नाही.

जर बायको किंवा (बायको नसल्याचे भाग्य असल्यास) मैत्रिणी बरोबर  थोडेसे खाद्यसाहस करायचे असेल तर खुशाल बेडेकर मध्ये जावे. बेडेकरांचे दुकान आहे लक्ष्मी रस्त्या जवळ मुन्जाबाचा बोळ आहे, तिकडे. गेली कित्येक वर्ष ह्यांचे दुकान आहे तसे आहे. नाही म्हणायला थोडी रंगरंगोटी आलीय. मालकांच्या तोंडावरचा नम्रभाव पुणेरी बाण्याला शोभत नाही. पण सदाशिवपेठी खडूसपणा नसला तरी मिसळ संपली हे सांगण्यात धन्य मानतात. पुणेरी उद्योजकांचे हे खास वैशिष्ट्य. एखादी गोष्ट आहे हे सांगण्यापेक्षा नाही हे सांगण्यात काय आनंद मिळतो ह्यांना. मुंबईच्या कामतांनी ह्यांच्या कडून  “नाही” म्हणायला शिकून घ्यावं. असो. मिसळीबरोबर जो रस्सा मिळतो त्याला इकडे सॅम्पल म्हणतात. गावात गेले की माझी इकडे एकदातरी वर्णी लागतेच.

बेडेकरच्या जवळच शानिपारापाशी आहे ते श्री उपहारगृह. नक्की जागा सांगता येत नाही, कारण त्याच भागात दोन तीन वेळा दुकानाची जागा बदलत आली आहे. मध्ये काही दिवस जरा चांगला गाळा होता, पण मी शेवटचा जेव्हा गेलो होतो तेव्हा एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या तळगृहात (basement) ह्यांचा थाट होता. जागा भारी गैरसोयीची. पण गर्दी कोण. लाईन लावून मिसळ खाल्ली होती. बाकी मी कोलेज मध्ये असताना मला ह्यांच्या बद्दल कळले होते. तेव्हा मित्राला पत्ता विचारला. मित्र पक्का पुणेरी. तेव्हा सरळ पत्ता थोडीच देतोय? मला म्हणाला, “शानिपारापाशी जा. इकडे तिकडे फिर. आणि एक जुनाट वाडा दिसेल. आणि अख्ख्या पुण्यात इकडेच अन्न मिळतं असं त्या वाड्यासमोरच्या गर्दी कडे पाहून तुला वाटेल. तेच श्री उपहारगृह. पाटी शोधायच्या भानगडीत पडू नकोस”. माझ्या ह्या भल्या मित्राचं वर्णन अगदी तंतोतंत जुळलं होतं. मागच्या खेपेला सुद्धा तीच परिस्थिती होती. मिसळ मात्र एकदम झणझणीत. मागे एकदा माझ्या मावशीच्या मिस्टरांना चुकून इकडे आणलं. बिचारे वयस्कर. कधी तिखट नं खाणारे. एक घास घेतला काय आणि आग आग झाली. शेवटी दही मागवून घेतलं आणि कशीबशी संपवली. मला काही बोलले नाहीत, पण नक्कीच चरफडले असणार. सध्या दोन मालकीणबाई दुकान चालवतात. ह्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले की अस्सल सदाशिवपेठी दर्शन होते. तसा मी निगरगट्ट आहे, पण श्री मध्ये मिसळ खाताना ह्या मालकीणबाईंचा कटाक्ष आपल्यावर पडला की उगाच पैसे न देता मिसळ खातोय कि काय अशी अपराधी भावना मनात येते. असो. ह्यांची साबुदाणा खिचडी पण एकदम मस्तं.

जर श्री च्या मिसळीने आणि त्यांच्या मालकीणबाईंच्या कटाक्षाने सुद्धा पोटात आग पडत नसेल, तर गरवारे कॉलेजचा रस्ता पकडावा. गरवारे कॉलेजजवळ कर्वे रस्त्यावरच एक टपरी आहे. नाव काटा किरर्र! इतकी लहान टपरी आहे की शोधायला वेळ लागतो. ह्यांची मिसळ म्हणजे तिखट जाळ. एक दोन घासात जिभेच्या संवेदना नष्टं होतात. एकदम बधीर व्हायला होतं. आणि पचनशक्ती चांगली नसल्यास, अजून पण बरंच काही बधीर होतं. ह्या तिखटाची अगदी नशा चढते. आणि टपरीची एकूण (अ)स्वच्छता पाहून मी इकडे कोणतेही पेय घेत नाही. तेव्हा मिसळ संपेपर्यंत सर्वांगाला घाम फुटतो. इकडून मिसळ खाऊन शेजारच्या रसवंती मधून उसाचा रस प्यायचा असा माझा क्रम.

बरं माझ्यासारखे काही अतिरेकी खवय्ये, ज्यांना ह्याहूनही तिखट हवे असेल तर त्यांनी चिंचवडच्या गांधी पेठेत, मशिदी समोरच्या गल्लीत नेवले ह्यांच्या उपहारगृहात जावं. ह्यांची  मिसळ इतकी तिखट की मी  त्या दुकानात शिरलो की नुसत्या घमघमाटाने माझ्या डोक्याला घाम येतो. एक इकडलीच मिसळ अशी आहे की मला सोबत लस्सी वगैरे पेयांचा आधार घ्यावा लागतो. (आत्ता ह्या मिसळीचा नुसता उल्लेख करून सुद्धा डोक्याला घाम सुटला म्हणजे विचार करा!)

बाकी अजून मंडई च्या जवळची श्रीकृष्ण भुवनची आणि टिळक रोड च्या रामनाथची मिसळ अजून चाखली नाही. ह्या शिवाय कोल्हापूरची देवीच्या देवळासमोर अलंकार ची मिसळ (आणि गोडाचा शिरा), कोल्हापुरलाच हॉटेल ओपलची मिसळ आणि मुंबईला गिरगावात विनय हेल्थ होमची  मिसळ (आणि पियुष) आवर्जून उल्लेखनीय.

बास, एव्हढं मिसळाख्यान झालं की उद्या गावात जाऊन मिसळ खालीच पाहिजे!

सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

मार्च 9, 2010 6 comments

आत्ताच याहूवर बातमी वाचली की राजला सर्वोच्च न्यायालयाकडून प्रक्षोभक भाषणे न करण्याचा उपदेश मिळाला. उत्तर भारतीयांबद्दल निदंक भाष्य केले म्हणून साहेबांवर काही बिहारी लोकांनी बिहार / उत्तर प्रदेश येथे खटले  भरले आहेत. ते खटले तिकडील स्थानिक न्यायालयात आहेत, ते सर्व एकत्र करून महाराष्ट्रात हलवावेत असा अर्ज राज साहेबांनी केला होता. ह्या बातमीत असा एक उल्लेख आहे की  बिहार / उत्तरप्रदेश येथे राज विरोधी वातावरण आहे  म्हणून राज साहेबाना तिकडे खटल्यासाठी उपस्थित राहण्यामध्ये सुरक्षेची चिंता आहे म्हणे. म्हणून हा खटाटोप.

आता ही गोष्ट आधी का नाही बरे सुचली? उगाच सापाच्या शेपटावर पाय ठेवायचा आणि मग साप चावेल अशी भीती बाळगायची. आता विस्तवात हात घातला  तर पोळून निघणारच ना? आपणच युद्धाला  तोंड फोडले आणि आता सुरक्षेच्या कारणावरून चिंता करणे मराठी मर्दाला शोभत नाही बुवा.

इन्शुरन्सचा फटका

मार्च 4, 2010 2 comments

मागच्याच आठवड्यात मी माझ्या वडीलांच्या हार्ट ऄटकबद्दल आणि माझ्या इन्शुरन्स बरोबर चाललेल्या वादाबद्दल लिहिले. आज insurance ombdusman ने इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने निकाल दिला! आता पुढचा पर्याय, कन्झुमर कोर्ट. म्हणजे पुढली पाच सहा वर्षं निश्चिंती!

भगवान के दरबारमें देर है मगर अंधेर जरूर नहीं :)

मावशी महिमा

मार्च 3, 2010 7 comments
हल्ली आता एकत्र कुटुंब वगैरे नामशेषच होत चालली आहेत. हम दो हमारे दो चा संसार. अशा ह्या छोट्या कुटुंबांमध्ये रोज सकाळी कोणाचे नियमित स्मरण होत असेल तर मावशीचे. घरातील कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्याचे जिच्यात सामर्थ्य आहे ती ही मावशी. भाषेचे राजकारण न खेळता अमराठी कुटुंबाना पण झक मारत मराठी बोलायला लावणारी ती ही मावशी. जिचे पाय घराच्या दाराशी आले नाही तर आपली पायधूळ घरातून निघत नाही ती ही मावशी. घरातील इतस्ततः विखुरलेल्या अनेक गोष्टीतून आपल्याला हवी ती गोष्ट निमिषार्धात शोधून देणारी मावशी. म्हणजे साक्षात कामवाली. हिचे वय २५ पासून ६० पर्यंत काही असो पण ती मावशीच. आणि घराचे मालक आणि मालकीण हे तिचे “ताई आणि दादा”. आता चिकित्सकांनी ह्या नातेसंबंधांचे जास्ती विश्लेषण करू नये कारण हाती काही लागणार नाही. केवळ दैनंदिन व्यवहारात एकमेकांना सौजान्यपणे संबोधायची उपनामे एव्हढाच हेतू.

ह्या मावश्यांच्या आपण केवढे अधीन असतो हे त्यांच्या गैरहजेरीतच समजते. तसं पाहिलं तर ह्यांचा घरातील वावर दिवसाला फारतर १ तास. पण शेजारण्यांची आख्खी दुपार ह्यांच्या विषयी चर्चा करण्यात जाईल. एकवेळ घरातील एखादं माणूस (बहुधा नवरा माणूसच) दिवसभर घरी फिरकलं नाही तरी बिघडत नाही पण ह्या मावशीबाई आल्या नाही  तर गृहिणींच्या जीवाची तळमळ होत राहते. घरकाम हे जरी त्यांचं प्रमुख कर्तव्य असलं तरी “Value Addition”  ह्या नावाखाली शेजाऱ्या पाजाऱ्या मंडळींची गुपितं सांगणे हे कामही आपलं कर्तव्याच असल्याप्रमाणे  ह्या मावश्या बजावत असतात. आणि गम्मत अशी की प्रत्येक घरात ह्या सांगणार की इतरांकडे कसं जास्त काम पडतं आणि तुमच्या कडे कसं सांभाळून घेतलं जातं वगैरे वगैरे. आता सुज्ञ गृहिणी यातून काय संकेत घ्यायचे ते घेतातच. जेव्हा जास्त स्तुती होते तेव्हा उधारीची मागणी ही होतेच. काही उडत्या पाखरांचे पंख मोजणाऱ्या चाणाक्ष गृहिणी तर ह्यांच्या स्तुतीसुमनांच्या तीव्रतेनुसार उधारीची रक्कम किंवा खाड्याचे दिवस मोजतात.

मध्ये एकदा आमच्या सोसायटीतील नवीनच ओळख झालेले एक शेजारी सहपरिवार आमच्याकडे गप्पा मारायला आले होते. गप्पा रंगात आल्या होत्या तेवढ्यात सौ शेजारी आपल्या नवऱ्याला घरी निघायची घाई करू लागल्या. नवऱ्याने नाराजीनेच विचारले “एव्हढी काय घाई?” तेव्हा सौ शेजारी म्हणाली की पोळ्या करायच्या मावशी कुलूप बघून निघून जातील. तेव्हा बिचाऱ्या नवऱ्याची प्रतिक्रिया बोलकी होती. तो मला म्हणाला, “पाहिलंत, घरात न राहणाऱ्या most important व्यक्ती पुढे ह्या घरात राहणाऱ्या least important व्यक्तीची काय किमत आहे ते? आता छान गप्पात रंगलो असताना, ह्या मावशीसाठी मला घरी जायला लागतंय” मला पटलं त्याचं बोलणं.

बाकी जेव्हा बायको माहेरी वगैरे जाते तेव्हा मात्र ह्या मावश्यांची किमत नवरे मंडळीना कळते. विशेष करून सैपाक करणाऱ्या मावशींची. तेव्हा “माय मरो पण मावशी जगो” च्या धर्तीवर म्हणावेसे वाटते “बायको माहेरी जावो, पण मावशी रोज येवो!”

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 36 other followers