पंढरीची वारी
वारकरी
आषाढ महिना म्हणजे पुण्यामध्ये वारीची धांदल असते. देहू वरून संत तुकारामांची पालखी आणि आळंदी वरून संत ज्ञानेश्वरांची. दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम. पूर्वी मी कॉलेजला असताना वारीचा आणि माझा संबंध हा फक्त पुण्यातील traffic बदल ह्या पुरताच मर्यादित होता. पण माझा मित्र रवी ह्याच्या कडून त्याच्या वारीचे (पुणे-सासवड) वर्णन ऐकले आणि मागच्या वर्षी मी पण त्याच्या बरोबर जायचे ठरवले. तेव्हा नुकतेच श्री कुंटे ह्यांचे नर्मदेऽऽहर पुस्तक वाचून मी प्रभावित झालो होतो. तेव्हा म्हटले नर्मदा परिक्रमा दूरची बात, एक पुणे सासवड पायी चालून जायचा तर अनुभव घेऊ!
तेव्हा पालख्यांच्या पुण्यातून प्रस्थानाच्या दिवशी मी आणि रवीने स्वारगेट पासून वारी चालू करायचे ठरवले. कमीत कमी सामान बरोबर असावे म्हणून एक पाण्याची बाटली आणि थोडेसे मेथीचे थेपले एवढेच घेतले. माझा नेहेमीचा वापरातील मोबाईल घरी ठेवून स्वस्तातील स्वस्त मोबाईल अगदी गरज लागली तर म्हणून घेतला. माझ्यासाठी हाच मोठ्ठा त्याग होता. कारण mobile with internet access म्हणजे माझ्या अंगाचा अविभाज्य भाग. तोच घरी ठेवला. खरं म्हणजे त्याग वगैरे काही नाही, उगाच चोरीला नको जायला म्हणून ठेवला. (आता घ्या! वारीला निघाले निवृत्तीचा आव आणून आणि चोरीची भीती! हा अध्यात्माचा मार्ग कठीणच बुवा!) आणि चक्क वाकड पासून स्वारगेट पर्यंत बस ने गेलो. भारतात परतल्यावर पहिल्यांदाच पुण्याचा बस चा प्रवास होता. पण वारीच्या धुंदीत होतो ना!
बरोबर सात वाजता रवी आणि मी स्वारगेट वरून सुरुवात केली. वाटेत आमच्या सारखी बरीच हौशी मंडळी होती. पुण्यात एक प्रथा आहे. वारकरी मंडळांना काही पुणेरी दानशूर मंडळी चहा, खिचडी, राजगिरा चिक्की असं बरंच काही फुकट वाटत असतात. बाकी पुण्यात फुकट काही मिळणार नाही. पण पुणेरी मंडळींचा वारकरी लोकांवर फारच जीव आहे. माझ्या महाग फोन बरोबर मध्यमवर्गीय शिष्टाचार पण मी घरीच सोडून आलो होतो, तेव्हा आम्ही बिनधास्त इतर वारकरीमंडळींबरोबर रांग लावून हे फुकट वाटप जमवत होतो. फक्त पिशव्या जास्ती जड होऊ नयेत एवढीच काळजी घेतली. तशी मला खाण्याची बरीच आवड. आणि नुसते थेपले सासवड पर्यंत काय पुरणार असा विचार. तेव्हा दोन चार चिक्कीची पाकिटे घेऊन ठेवली. चहा तर केव्हाही प्रियच. शिवाय एवढा चालणार त्यामुळे जास्त गोड पोटात गेल्यावर येणारी अपराधी भावना नाही.
जसे आम्ही कॅम्प च्या जवळ आलो तशी वारकरी मंडळींची गर्दी वाढू लागली. रस्ते गाड्यांना बंदच होते. जेथे बघाल तिकडे फक्त माणसेच. काही पुरुष झेंडे घेऊन चालले होते, बायकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन. लोक आपापल्या दिन्ड्यांबरोबर भजने गात चालली होती. आम्हीच आपले सडे फटिंग, दोन माणसांची दिंडी. साधारण हडपसर पर्यंत पोचलो असू तेव्हा ज्ञानोबांच्या पालखीचे दर्शन झाले. माउलींच्या पादुकांचे दर्शन घ्यायला कोण गर्दी होती. आम्ही पण त्या गर्दीत सामील होऊन धक्का बुक्की खात पादुकांचे दर्शन घेतले. रवीने बरोबर त्याचा कॅमेरा आणला होता. तेव्हा त्याने काही फोटो काढले. जवळपास सात किलोमीटर चालल्यावर आम्ही पहिली विश्रांती चहाच्या टपरीवर घेतली. माझा विश्वास बसत नव्हता की मी चक्क स्वारगेट ते फुरसुंगी नाका विनासायास चालून आलो. अधून मधून मी रविला विचारात असे की आपण एकूण पल्ल्याच्या किती टक्के चाललो. रवी अगदी वारकरी माणसाच्या निर्विकार चेहेऱ्याने सांगे की अजून खूपच चालायचे आहे.
तेव्हा फुरसुंगी सोडून आम्ही उरळी देवाच्या दिशेने चालू लागलो. उरळी देवाची ह्या गावाच्या नावात देव आहे पण हवेत राम नाही. आख्या पुण्याचा कचरा ह्या ठिकाणी आणून टाकला जातो. पूर्ण गावात ह्या कचऱ्याचे प्रदूषण जाणवते. स्वतःचे जीवन आरामदायी व्हावे म्हणून ह्या गावाला आपण नकळत त्रास देत आहोत अशी भावना मनात आली आणी वाईट वाटले. इकडेच एका गावात पालखी च्या स्वागताची जोरात तयारी चालली होती. पालखीचे येथे थोडावेळ विश्रांतीचे स्थान. त्या जागी, गावातील पोलीस महिलांनी छान सडा टाकून रांगोळी काढली होती. पोलिसी वेशातील ही भाविकता एकदम भारी वाटली. येथेच एके ठिकाणी रस्त्यावार खिचडी वाटत होते. आता खिचडी म्हणजे मला खूपच प्रिय! आणि जवळची चिक्की इतर वारकऱ्यांना देऊन आणि स्वतः खाऊन संपली होती. तेव्हा खिचडी खाल्ली आणि दिवेघाटाच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
दिवेघाटाच्या पायथ्याशी बरीच रोडसाईड हॉटेले होती. मिसळ पाव अशी पाटी दिसली आणि राहवले नाही. रवीला म्हटले “खायची?” आता रविला माझा खवय्या स्वभाव माहिती, तेव्हा तो नाही काय म्हणणार? आणि नाहीतरी म्हणच आहे ना, आधी पोटोबा माग विठोबा. मिसळ खाल्ली आणि थोडे पुढे गेलो. पण भूक भागली नव्हती. दुपारचे बारा पण वाजून गेले होते. बरेच वारकरी त्यांची शिदोरी उघडून बसले होते. आम्ही पण मग एके ठिकाणी पेपर पसरून थेपले वगैरे खाऊन घेतले. थोडावेळ पाय पसरून बसलो. एव्हाना आमचा चालण्याचा वेग पण कमी झाला होता. दुपारचे उन तळपत होते आणि पावसाचा पत्ता नाही. थोडी विश्रांती झाल्यावर घाट चढायला घेतले. घाटाच्या सुरुवातीच्या वळणाला short cut म्हणून शेतातून पायवाट होती ती पकडली. येथे एक गंमत दिसली. इकडून जाणारे वारकरी रस्त्यातील दगड गोळा करून एकावर एक रचून ठेवत होते. आम्हाला काही कळेना की असे का करत आहेत. तेव्हा एका आजीला विचारले कि बाई असे मनोरे का लावताय? आजी म्हणाल्या “जग करतंय म्हणून मी पण करतेय!” कोणीही आम्हाला सांगू शकलं नाही की असे मनोरे का करतात ते. जाऊदे. पुढल्या वारीला उत्तर शोधायचा प्रयत्न करू.
ह्या दिवेघाटाने मात्र माझा दम तोडला. रवी मात्र जीम ला वगैरे जाणारा. त्यामुळे तो सहज चालत होता. पण डोक्यावर सूर्य आणि चढ ह्यामुळे मी मात्र दमत होतो. शिवाय जवळचे पाणी पण संपत आले होते. तरी बरं घाटाच्या सुरुवातीला पाण्याच्या बाटल्या फुकट वाटत होते. आम्ही दोघांनी गर्दीत घुसून दोन बाटल्या हस्तगत केल्या होत्या. घाटात आम्ही ४-५ वेळा तरी थांबलो. श्वास घ्यायला. शेवटी कसा बसा घाट संपला. घाटमाथ्यावर मस्त थंड दूध कोल्ड्रिंक मिळालं. ते प्यायलो. पुढे एका हॉटेलात चहा प्यायलो आणि पाय ताणून बसलो. एव्हाना हवा पण बदलू लागली होती. ढगांनी गर्दी केली होती. आम्ही पुढच्या वाटेला लागलो. थोड्याच वेळात पाऊस सुरूच झाला. रवी कडे पांचो होता. पण मी मात्र भिजणे पसंत केले.
पाऊस सुरु झाला तशी वारकरी लोकांची इरकल बाहेर आली. पण आता वारकरी पण आधुनिक झाले आहेत बरंका.त्यांची इरकल म्हणजे frito lay च्या पिशव्या ज्या प्लास्टिक सदृश कागदाच्या असतात ना, तशी होती. आणि त्यावर वेग वेगळ्या अमेरिकन कंपन्यांचे लोगो! बहुतेक हे packing material भारतातून निर्यात होत असावं. आणि जो माल नाकारला जातो, त्याचा असा अभिनव उपाय करत असावेत. जिकडे बघावं तिकडे नुसते अमेरिकन लोगो! आणि त्याच्या आत वारकरी! आगळं वेगळंच दृश्य होतं. बाकी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळांच्या बागा होत्या. डाळींब आणि सीताफळ. मस्त वाटत होतं.
जसे सासवड जवळ आले तसे शेतात तंबू दिसू लागले. दिंड्यांच्या मुक्कामाची सोय चालली होती. आम्ही ४ च्या दरम्यान सासवडला पोचलो. आमची वारी येथेच संपली होती. आता सोय पहायची होती परतीची. सासवड च्या बस स्थानकापाशी गेलो तर तेथून एकही बस जात नव्हती. त्यांनी सांगितले की थोडे पुढे जा, तिकडून कापूरहोळला जायची सोय होईल. आता हे शेवटचे फर्लांग अंतर काही मला काटवत नव्हते. शेवटी रवी रिक्षा बस ची सोय पाहायला पुढे गेला आणि मी मागून हळू हळू चालत येत होतो. एक जीप मिळाली. ६-७ माणसे होती. त्यात आम्ही पण शिरलो. रवी मागे आणि मी पुढे ड्रायव्हर शेजारी. आम्हाला वाटले की आमच्या भरतीनंतर जीप भरली, पण ड्रायव्हरमहाराजांना तसे वाटत नव्हते. म्हणून अजून कोंबली. मला वाटतं आम्ही एकूण १२ जण त्या जीप मध्ये होतो. पुढच्याच आसनावर एकूण ४! मी दोन पेहेलवानांच्या मध्ये. एरवी मी वैतागलो असतो, पण फुकट शरीर चेपून मिळत होते. जीपवर बसल्याबरोब्बर लगेच घरी फोन करून घरची गाडी कापूरहोळला बोलावून घेतली. अर्ध्या तासात कापूरहोळला पोचलो. उतरलो आणि थोड्याच वेळात आमची गाडी आली. आणि आम्ही वारकरी अवतारातून बाहेर येऊन मध्यमवर्गीय जीवनशैलीत पुनःपदार्पण केले.
एका दिवसात २९ किलोमीटर चालण्याचा माझा तरी पहिलाच अनुभव होता. पण एकूण मजा आली. आता दरवर्षी जायची ईच्छ आहे. बघू कसं काय जमतंय ते!


अगदी साधं, सहज आणि प्रामाणिक लिहिलं आहे..छान!
प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद!
wari ha vishaych vegala aahe anubhavacha aahe
mazhakadun dar varshi wari ghadate ti 4,5,mukkam gaon
khup khup samadhan hote .warkarancya nikkhal manache darshan hote ,satvikta,sahajpana ,shiya kothalyahi parithtt
aanadi kase rahave he warkaryankadun shikave .
jay hari………
jay jay ram krishna hari……..
प्रतिक्रिये बद्द्ल धन्यवाद! वारीचा अनुभव समाधान देउन जातो हे खरंच!
chan ahe. awadala.
shriram,,,,,,,jay hari
mazi pratham vari hi budhi ne zali
dusari vari vicharane zali
tar tisari vari varkari ya bhavnene zali ……tyapasun mi aajprayant varkarich aahe varkarich rahanar…….kinbhuna vari tach rahil …..tya nantar mala varit pratasha jayala jamale nahi
tari mi varkari asanar aahe hi shri pandurangachi krupa …….jay hari.
Niranjan,
I had expected more about experiences with fellow-warkari and how did it feel to do it – khupach samadhaan vagaire vaatle ka te aani waari madhlyaa changlya-vaait goshti and maybe ‘aayushyaat pahilyaandach misal-paav baghun man vichalit zaale naahi vagaire’…
Meenakshi
Meenakshi,
Sorry for such a delayed response. For some reason, I did not see the comments moderation page. Thanks for the candid feedback. Some of the experiences from wari were such that there are no right words to express. But I will keep in mind your comments for future writings
श्रीराम……………….
जय हरी …..
माझी पहिली वारी बुद्धीने …….
दुसरी विचारा ने ……………
तिसरी भावनेने ………………घडली ……ती उर्जा मला आताही चवथ्या वर्षीही पुरते आहे.
जय जय राम कृष्ण हरी……….मुकुंद